Saturday 9 November 2013

प्रियांश...८


इतिहासातील काळा दिवस म्हणून याचं दिवसाची नोंद असेल…कोणताही समाज मग तो जगाच्या पाठीवरचा कोणताही देशातला असू दे… स्त्रिचा अवमान करून श्रेष्ठ ठरूच शकत नाही…याचं दिवशी कुरुक्षेत्राचा दिशेने पहिलं भक्कम पाऊल पडले…जुगारात स्वतः  ला हरलेल्या युद्धीष्ठीराने पांचालीला पणाला लावले…पाच योद्धे नवरे असूनही ते लाचार दासांप्रमाणे मान खाली घालून गपचूप बसले होते…आपल्या मोठ्या भावाच्या चुकीच्या गोष्टीना तिथेच न थांबवता, भातृप्रेमात अंध झालेल्या अर्जुनाला शांत बसवलंच कसं?…शंभर हत्तीचं बळ दंडात असूनही नपुंसकासारखा तो भीम गारद कसा झाला? सत्य आणि धर्माचा पक्का युद्धीष्ठीराचा न्याय बुद्धी तर्क आपल्याच बायकोच्या वस्त्र्हरणात विलीन का झाला?…रणांगणात शत्रूंना चितमुंडी गारद करणाऱ्या त्या नकुल-सहदेव ला इतका घोर अवमान सहनच कसा झाला?…बहिणीची छेड काढली म्हणून मारामारी करणारे ते भाऊ या अश्या षंढांपेक्षा लाख गुणा चांगलेच…आपल्या आया-बहिणीसाठी पेटून उठणारेच खरे योद्धे…कृष्णदेव धावून आले म्हणून ती पांचाली वाचली…नाही तर काय झाले असते?…वाचून तिच्या नजरेला नजर देण त्या पाचही पांडवांना किती अवघड झालं असेलं…तिच्या नजरेत पुन्हा उभे राहण्यासाठी मांडण्यात आलेला तो डाव म्हणजेच महाभारत नाही का??? 
एका स्त्रिला दोषी ठरवून आपण खुशाल टाळ्या बडवत असतो…स्त्रिच प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असते म्हणून निष्कर्ष काढून तिच्या माथ्यावर सगळ मारून बोललं जात…एक स्त्रिच विनाशाला कारणीभूत असते…पण, मग अश्या  षंढांच काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही,…प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात…माझ्या नजरेत महाभारत घडण्यास कारणीभूत फक्त पांचाली आणि दुर्योधन नाहीत तर स्वतः पांडवच आहेत!…आताच्या जगात सुद्धा दुर्योधन कितीही असोत पण, पांडव गप्पच आहेत…जो पर्यंत ते गप्प राहतील तोपर्यंत अशी वस्त्रहरणे होतच राहणार…आता तुम्हीच ठरवा तुम्ही पांडव व्हाल कि कृष्ण!

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment